चांगले दिवस सरत आले …
सर्वांनी चांगलं जगावं. सर्वांनी श्रीमंत व्हावं. सर्वांना श्रीमंत, संपन्न होण्याची समान संधी असावी. ते होताना त्यात निकोप स्पर्धा असावी. अशी स्पर्धा ज्या स्पर्धेतून माणसाच्या सर्व क्षमता विकसित होतील आणि माणसाचा अधिक चांगला समाज करण्याचा शोध सतत चालू राहील. हे चांगल्या, सुदृ्ढ समाजाचं लक्षण.
परंतु, काहीच श्रीमंत होतील, तेच श्रीमंत रहातील. त्यांचीच संपत्ती वाढत जाईल. वाढतच जाईल. त्या श्रीमंतांचं वेगळं जग तयार होईल. मग त्या संपत्तीकडे पहात काही थोडे धडपडत रहातील. बहुसंख्य गरीब अधिक गरीब होत रहातील. त्या पहिल्या जगापासून हे जग दूर दूर जाईल. हे म्हणजे विकृत समाजाचं लक्षण.
गेली काही वर्ष डेव्हाॅसला ऑक्सफॅम समाजातली ही विकृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दिसतंय असं की ह्यात सुधारणा न होता विकृती वाढतच चालली आहे. तुम्हाला डेव्हिड अॅटनबरो आठवतोय? ज्याच्या “प्लॅनेट अर्थ” सारख्या माहितीपटानं आपल्याला आपलाच परिसर किती सुंदर आणि नयनरम्य आहे हे सांगितलं. त्या सध्या ९२ वर्षाच्या ह्या प्रतिभावान माणसानं कालच त्या परिषदेत सांगितलं की “चांगले दिवस आता सरले आहेत”..
आकडेवारीत फार जायची गरज नाही. भारतातल्या फक्त १% लोकांकडे देशातली ५१.५३% संपत्ती आहे किंवा अतीश्रीमंतांच्या संपत्तीवर फक्त अर्धा टक्का “संपत्ती कर” लावला तर देशातल्या आरोग्य सेवेवर आपल्याला ५०% अधिक खर्च करता येईल इतकं पुरेसं आहे. सांगोल्याहून पुण्याला आलेल्या तुकारामनं गेली १० वर्ष पै अन पै जमा केली आणि बापाच्या आजारपणात सगळी गेली. नंतर काही दिवसानी बापही सोडून गेला. मेळघाटच्या अशोकच्या मनात श्रीमंत व्हायचं आहे, पण श्रीमंत व्हायचं तर जे शिकावं लागेल ते सध्या विकतच मिळतं. ते खरेदी करायचं तर वडिलोपार्जित जमीन त्याला विकावी लागेल. काय करावं त्याच्या पुढे प्रश्न आहे.
त्यामुळे आकडेवारीपेक्षा आपल्या आसपास काय दिसतंय हे महत्वाचं. श्रीमंत आणि गरीबांच्या शाळा वेगळ्या. खरेदी करण्याची दुकानं वेगळी. प्रवास करण्याचे मार्ग वेगळे. पुढे जाण्याची संधी वेगळी. ती दोन्ही जगंच वेगळी. असं होताना दिसतं आहे. गेल्या चार-पाच वर्षांचे अहवाल पाहिले तर हे जवळ येतंय असं दिसत नाही. किंबहुना अधिक गतीनं ह्यांच्यातील फरक वाढताना दिसतो आहे. मी जेंव्हा ह्या वाढत्या विषमतेविषयी अर्थतज्ञांशी बोलतो किंवा समाजात ज्यांना जाणकार, विद्वान म्हटलं जातं अशांशी बोलतो तेंव्हा “विषमता” हा कुठला “डाऊन-मार्केट विषय” असा त्यांचा चेहरा होतो. ही समाजाचं धोरण ठरवणारी माणसं पण ह्यांनी कानावर हात ठेवले आहेत. दुष्काळानं लोक जगायला आपापली गावं सोडता आहेत असं म्हटलं तर त्याचा अर्थ त्यांना समजत नसल्याचा त्यांचा चेहरा होतो. त्यांनाही कुठलीतरी सवंग चटक लागली असल्याचं त्यांचा चेहराच सांगतो. त्याशिवाय ह्या गोष्टी ऐकू येणार नाहीत असं होणार नाही.
थाॅमस पिकेटीनं काही वर्षांपूर्वी जगातली ही विषमता दाखवली आणि आपली भांडवलशाहीच गंडली आहे का, किंवा पराभूत झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली. दर वर्षीच्या ऑक्सफॅम अहवालानं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु परिस्थिती आता अहवाल लिहिण्या-वाचण्याच्या पलिकडे गेली आहे.
ह्या दोन जगातलं हे अंतर असंच वाढत गेलं तर काय होईल? एका मोठ्या वर्गाला सतत वंचित ठेवून श्रीमंतांना त्यांची श्रीमंती भोगता तरी येईल का हा प्रश्न आहे. तीव्र सामाजिक असंतोष विचित्र पध्दतीनं बाहेर येत राहील. ह्या श्रीमंतांच्या हावरटपणापायी निसर्गही प्रतिकार करेलच. आज तो प्रतिकार हवामानातील बदल किंवा तापमानवाढीनं समोर येतो आहे. निसर्गाच्या तापमानाबरोबर समाजाचंही तापमान वाढेल. अस्वस्थ, रागावलेल्या गरीबांचे लोंढे श्रीमंतांच्या वस्तीबाहेर आदळतील. आत्ता ते आदळत नाही आहेत कारण त्या अस्वस्थ लोकांतील काहींना वाटतंय की आपणही इतरांच्या नकळत हळूच शिडी चढून “त्या” जगात प्रवेश करू. अगदी त्या जगात नाही तरी त्या जगात जाऊ इच्छित असलेल्या एका स्वप्नाळू जगात जाऊ. एखादी पीढी ह्यात वाट पाहील अधिक नाही.
मग ज्यावेळी सामाजिक असंतोष प्रगट होईल त्याचवेळी निसर्गही कोपला असेल. तोपर्यंत पृथ्वीही इतकी तापलेली असेल की फार उत्तर शोधूनही उपयोग नसेल. हे खरं आहे की ज्या ज्या वेळी माणसासमोर संकटं आली त्या त्या वेळी त्यानं त्याच्या समजंसपणानं त्यावर मात केली. ज्या ज्या वेळी त्याला मार्ग सापडत नाही असं वाटलं त्या त्या वेळी त्यानं नवा धर्म शोधला किंवा नवी जीवनपध्दती.
“चांगले दिवस सरत आले ..” असं म्हणताना त्या डेव्हिड अॅटनबरोनं ही एक सूचना देऊन ठेवली आहे. आपला आपल्या समजंसपणावर विश्वास आहे. काही लोकांच्या वैयक्तिक हावरटपणापोटी सगळं घालवून टाकायला आपण तयार नाही. आपल्याला ह्यासाठी व्यापक घुसळण करावी लागेल. ह्या व्यापक घुसळणीतून नवा समाज, नवा जीवनधर्म, नवी जीवनप्रणाली आणि नवी आर्थिक व्यवस्था उदयाला येईल. ती व्हावी ह्यासाठी आपले प्रयत्न हवेत.
अनिल शिदोरे
anilshidore@gmail.com
सर्वांनी चांगलं जगावं. सर्वांनी श्रीमंत व्हावं. सर्वांना श्रीमंत, संपन्न होण्याची समान संधी असावी. ते होताना त्यात निकोप स्पर्धा असावी. अशी स्पर्धा ज्या स्पर्धेतून माणसाच्या सर्व क्षमता विकसित होतील आणि माणसाचा अधिक चांगला समाज करण्याचा शोध सतत चालू राहील. हे चांगल्या, सुदृ्ढ समाजाचं लक्षण.
परंतु, काहीच श्रीमंत होतील, तेच श्रीमंत रहातील. त्यांचीच संपत्ती वाढत जाईल. वाढतच जाईल. त्या श्रीमंतांचं वेगळं जग तयार होईल. मग त्या संपत्तीकडे पहात काही थोडे धडपडत रहातील. बहुसंख्य गरीब अधिक गरीब होत रहातील. त्या पहिल्या जगापासून हे जग दूर दूर जाईल. हे म्हणजे विकृत समाजाचं लक्षण.
गेली काही वर्ष डेव्हाॅसला ऑक्सफॅम समाजातली ही विकृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दिसतंय असं की ह्यात सुधारणा न होता विकृती वाढतच चालली आहे. तुम्हाला डेव्हिड अॅटनबरो आठवतोय? ज्याच्या “प्लॅनेट अर्थ” सारख्या माहितीपटानं आपल्याला आपलाच परिसर किती सुंदर आणि नयनरम्य आहे हे सांगितलं. त्या सध्या ९२ वर्षाच्या ह्या प्रतिभावान माणसानं कालच त्या परिषदेत सांगितलं की “चांगले दिवस आता सरले आहेत”..
आकडेवारीत फार जायची गरज नाही. भारतातल्या फक्त १% लोकांकडे देशातली ५१.५३% संपत्ती आहे किंवा अतीश्रीमंतांच्या संपत्तीवर फक्त अर्धा टक्का “संपत्ती कर” लावला तर देशातल्या आरोग्य सेवेवर आपल्याला ५०% अधिक खर्च करता येईल इतकं पुरेसं आहे. सांगोल्याहून पुण्याला आलेल्या तुकारामनं गेली १० वर्ष पै अन पै जमा केली आणि बापाच्या आजारपणात सगळी गेली. नंतर काही दिवसानी बापही सोडून गेला. मेळघाटच्या अशोकच्या मनात श्रीमंत व्हायचं आहे, पण श्रीमंत व्हायचं तर जे शिकावं लागेल ते सध्या विकतच मिळतं. ते खरेदी करायचं तर वडिलोपार्जित जमीन त्याला विकावी लागेल. काय करावं त्याच्या पुढे प्रश्न आहे.
त्यामुळे आकडेवारीपेक्षा आपल्या आसपास काय दिसतंय हे महत्वाचं. श्रीमंत आणि गरीबांच्या शाळा वेगळ्या. खरेदी करण्याची दुकानं वेगळी. प्रवास करण्याचे मार्ग वेगळे. पुढे जाण्याची संधी वेगळी. ती दोन्ही जगंच वेगळी. असं होताना दिसतं आहे. गेल्या चार-पाच वर्षांचे अहवाल पाहिले तर हे जवळ येतंय असं दिसत नाही. किंबहुना अधिक गतीनं ह्यांच्यातील फरक वाढताना दिसतो आहे. मी जेंव्हा ह्या वाढत्या विषमतेविषयी अर्थतज्ञांशी बोलतो किंवा समाजात ज्यांना जाणकार, विद्वान म्हटलं जातं अशांशी बोलतो तेंव्हा “विषमता” हा कुठला “डाऊन-मार्केट विषय” असा त्यांचा चेहरा होतो. ही समाजाचं धोरण ठरवणारी माणसं पण ह्यांनी कानावर हात ठेवले आहेत. दुष्काळानं लोक जगायला आपापली गावं सोडता आहेत असं म्हटलं तर त्याचा अर्थ त्यांना समजत नसल्याचा त्यांचा चेहरा होतो. त्यांनाही कुठलीतरी सवंग चटक लागली असल्याचं त्यांचा चेहराच सांगतो. त्याशिवाय ह्या गोष्टी ऐकू येणार नाहीत असं होणार नाही.
थाॅमस पिकेटीनं काही वर्षांपूर्वी जगातली ही विषमता दाखवली आणि आपली भांडवलशाहीच गंडली आहे का, किंवा पराभूत झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली. दर वर्षीच्या ऑक्सफॅम अहवालानं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु परिस्थिती आता अहवाल लिहिण्या-वाचण्याच्या पलिकडे गेली आहे.
ह्या दोन जगातलं हे अंतर असंच वाढत गेलं तर काय होईल? एका मोठ्या वर्गाला सतत वंचित ठेवून श्रीमंतांना त्यांची श्रीमंती भोगता तरी येईल का हा प्रश्न आहे. तीव्र सामाजिक असंतोष विचित्र पध्दतीनं बाहेर येत राहील. ह्या श्रीमंतांच्या हावरटपणापायी निसर्गही प्रतिकार करेलच. आज तो प्रतिकार हवामानातील बदल किंवा तापमानवाढीनं समोर येतो आहे. निसर्गाच्या तापमानाबरोबर समाजाचंही तापमान वाढेल. अस्वस्थ, रागावलेल्या गरीबांचे लोंढे श्रीमंतांच्या वस्तीबाहेर आदळतील. आत्ता ते आदळत नाही आहेत कारण त्या अस्वस्थ लोकांतील काहींना वाटतंय की आपणही इतरांच्या नकळत हळूच शिडी चढून “त्या” जगात प्रवेश करू. अगदी त्या जगात नाही तरी त्या जगात जाऊ इच्छित असलेल्या एका स्वप्नाळू जगात जाऊ. एखादी पीढी ह्यात वाट पाहील अधिक नाही.
मग ज्यावेळी सामाजिक असंतोष प्रगट होईल त्याचवेळी निसर्गही कोपला असेल. तोपर्यंत पृथ्वीही इतकी तापलेली असेल की फार उत्तर शोधूनही उपयोग नसेल. हे खरं आहे की ज्या ज्या वेळी माणसासमोर संकटं आली त्या त्या वेळी त्यानं त्याच्या समजंसपणानं त्यावर मात केली. ज्या ज्या वेळी त्याला मार्ग सापडत नाही असं वाटलं त्या त्या वेळी त्यानं नवा धर्म शोधला किंवा नवी जीवनपध्दती.
“चांगले दिवस सरत आले ..” असं म्हणताना त्या डेव्हिड अॅटनबरोनं ही एक सूचना देऊन ठेवली आहे. आपला आपल्या समजंसपणावर विश्वास आहे. काही लोकांच्या वैयक्तिक हावरटपणापोटी सगळं घालवून टाकायला आपण तयार नाही. आपल्याला ह्यासाठी व्यापक घुसळण करावी लागेल. ह्या व्यापक घुसळणीतून नवा समाज, नवा जीवनधर्म, नवी जीवनप्रणाली आणि नवी आर्थिक व्यवस्था उदयाला येईल. ती व्हावी ह्यासाठी आपले प्रयत्न हवेत.
अनिल शिदोरे
anilshidore@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा