रविवार, मे १३, २०१२

चपाती नको, भाकरी हवी!

सुमारे ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, किंवा त्यापेक्षाही थोडी आधीची असावी. 


एका बैठकीत होतो. विषय काहीतरी पाण्याविषयी होता, नेमका काय होता, लक्षात नाही.... पुण्यात अलका टॉकीज चौकात भारती विद्यापीठाची सध्याची इमारत आहे तिथे कुठेतरी बैठक होती. बरीच नामवंत मंडळी होती, स्वयंसेवी क्षेत्रातली, पाणी प्रश्नावर काम करणारी. बरीच.


सकाळचे सत्र झाले आणि जेवणाची सुटटी झाली. आम्ही सर्वजण आपापल्या ताटल्या घेऊन रांगेत उभे होतो. रांग हळूहळू पुढे सरकत होती. पदार्थ ठेवलेल्या टेबलाजवळ माझी पाळी आली. तेंव्हा मला गव्हाची चपाती आवडते म्हणून ती मी उचलली तर मागून कुणीतरी ढोसलं आणि म्हटलं : "अनिल, महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर गव्हाची चपाती नको तर ज्वारीची भाकरी खा." मी चमकून पाहिलं तर ते होते विलासराव साळुंखे, पाणी-पंचायतचे. पाण्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास. त्यांनी महाराष्ट्राला पाण्याविषयी खूप गोष्टी शिकवल्या. ते पुणे जिल्ह्यात तेंव्हा कुठेतरी काम करायचे. 


ते म्हणाले, गहू पिकवायला ज्वारीपेक्षा खूप पाणी लागतं. कित्येक पटीनं. त्यामुळे आपण गव्हाची जास्त मागणी केली तर शेतकरी तो जास्त लावेल आणि गव्हाचं क्षेत्र वाढेल. गव्हाचं क्षेत्र वाढलं की पाण्याची मागणी वाढेल आणि पाण्याच्या ह्या वाढलेल्या मागणीला पुरं पडेल एव्हढं पाणी महाराष्ट्रात नाही, करायचं म्हटलं तर त्याला खर्च खूप येईल. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. 


विलासरावांचे शब्द फार महत्वाचे आणि दूरचा विचार करणारे होते. 


गहू तर सोडा, आता महाराष्ट्रात उसाच्या लागवडीचं प्रमाण अचाट झालं आहे आणि महाराष्ट्रात पाण्याचं संकट निर्माण होण्याची जी जी काही कारणं आहेत त्यात चुकीची पीक- लागवड हेही एक कारण आहे, कारण उसाला तर गव्हापेक्षाही प्रचंड पाणी लागतं. 


आपण नेहमी म्हणतो, सरकारनं हे करायला पाहिजे, राजकारण्यांनी तसं वागायला पाहिजे, वर्तमानपत्रांनी तसं छापायला पाहिजे. तसं आपण म्हणावंच पण ह्यात आपण काय करू शकतो ह्याचाही विचार करावा. स्व:त:पासून आपण सुरूवात करावी. 
मी विचार करायला लागलो आणि मला वाटलं "आपण गहू खाण्याचं कमी करून भाकरी खाणं सुरु करायला पाहिजे". तेव्हढीच महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यात माझा सहभाग. मी गव्हाची मागणी नुसती कमी करणे हे एक आर्थिक आणि धोरणात्मक विधान आहे. ते मी करायलाच पाहिजे. त्यामुळे पाण्याची गरज कमी होईल, पाण्याचं संकट कमी होईल, दुष्काळ हटेल, दु:खाचा काळ जाईल. 

त्यामुळे आजपासून मी गव्हापेक्षा ज्वारी जास्त खायला सुरुवात करणार आहे. 


: म्हणणार आहे: "चपाती नको, भाकरी हवी!".


रविवार १३ मे, २०१२  

Visit to oasis..

While traveling in drought affected villages in Western Maharashtra, I found an oasis. I was thirsty of some thing positive, something inspirational and something which I should look up to. In village Jalihal, which I was visiting after nearly a decade, Yerala Projects Society has created something which should teach us how to respond to drought like situation. Raja Deshpande and his colleagues, having very pragmatic approach to development are successful in creating and strengthening confidence within people of Jath tehsil of Sangli District. I felt very proud and nice because I was associated, though distantly, to this project for few years... good to have such examples.