शनिवार, फेब्रुवारी ०२, २०१३

इतिहासातील क्षण


इतिहासातील क्षण

येणारं जग कसं असेल ह्यावर अनेकांचे अनेक विचार आहेत. 

कुणी म्हणतं संहारक अण्वस्त्रांच्या भितीमुळे आपण नामशेषही होऊ शकतो तर कुणी म्हणतं माणसाचा इतिहास हा सतत चांगलं होण्याचा इतिहास आहे. ह्याबाबत खूप मतं मतांतरं आहेत, पण एका बाबतीत मात्र बहुतेक सर्वांचं एकमत आहे आणि ते म्हणजे, येणारं जग हे स्त्रीचं जग नक्की असणार आहे.

हे लोक असं का म्हणतात?

विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाची काम करण्याची पद्धत बदलत गेली. पूर्वी शारिरीक श्रमाला महत्व असे. त्या श्रमाचं मोल असे. आता असं नाही. सध्या संगणकामुळे, बदलत्या आर्थिक घडीमुळे स्त्रियांना खूप वाव मिळू लागला आहे. पूर्वी जे काम करायला मजबूत शारिरिक क्षमता लागायची आता तेच काम साध्या सोप्या शारिरीक श्रमात पण वेगळ्या प्रकारच्या काैशल्यांच्या संचात करता येतं. 

आर्थिक चाैकट बदलते आहे तशी राजकीय चाैकटही बदलते आहे. स्त्रीला प्रचंड वाव मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. तिच्या कामाचं वाजवी मूल्यं मिळणं, तिला योग्य सन्मान मिळणं ही गोष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. कधी नव्हे तेव्हढी स्त्रीच्या हक्कांविषयी आणि तिला सन्मान देण्याविषयीची जाणीव निर्माण झाली आहे. 

इतिहासातला हा एक महत्वाचा क्षण आहे. तो नेमकेपणानी पकडून स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामधील संपूर्ण समानता साधण्याचं काम आपण आत्ताच करू शकतो. आत्ताच.



अनिल शिदोरे

२ टिप्पण्या: