बुधवार, फेब्रुवारी ०६, २०१९

लोकपाल आणि लोकायुक्त : अण्णांच्या लढ्याचं फलित

काल अण्णांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींकडून लोकपालाची निर्मिती तातडीनं केली जाईल हे आश्वासन मिळवलं म्हणजे नेमकं काय झालं?

लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, २०१३

लोकपालचा अर्थ मुळात लोकांची काळजी घेणारा असा आहे. लोकपालाचा गाभा असा की लोकशाहीमध्ये शासनाची जबाबदारी लोकांसाठी काम करण्याची असते. ह्या शासनव्यवस्थेच्या प्रशासकीय कारभाराबाबत लोकांची तक्रार असेल तर त्याची नोंद घेऊन चौकशी करणं आणि लोकांच्या हक्क-अधिकारांचं पालन नीट होतंय की नाही ते पहाणं. हे पहाणारा स्वतंत्र-स्वायत्त अधिकारी म्हणजे लोकपाल. लोकपाल ही संस्था नागरिकांनी त्यांच्या प्रतिनिधींना निवडून देऊन जबाबदारी दिलेल्या लोकांवर अंकुश ठेवण्याचं काम करते. ह्यात राजकीय आणि प्रशासकीय असे दोघेही आले. साधारण न्यायव्यवस्था अशा भ्रष्टाचाराच्या केसेस सोडवण्यासाठी पूर्णपणे कार्यक्षम असतेच असं नाही म्हणून ही नवी व्यवस्था उभी करावी असं ठरलं.

जगातल्या अनेक लोकशाही देशांनी लोकपाल व्यवस्था स्विकारली आहे.

आपल्या देशानं हा कायदा लोकसभेत २९ डिसेंबर २०११ ला मंजूर केला. नंतर तो राज्यसभेत १७ डिसेंबर २०१३ ला मंजूर झाला. राज्यसभेत जे बदल सुचवले गेले होते ते १८ डिसेंबर २०१३ ला लोकसभेनं स्विकारले. अण्णांची मागणी ही होती की पाच वर्षांपूर्वी हा कायदा आला तरी त्याची अंमलबजावणी का नाही झाली?

लोकपाल केंद्रासाठी आहे आणि लोकायुक्त राज्यांसाठी आहे. दोन्ही स्वायत्त असावेत अशी अपेक्षा आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करत असलेल्या (public functionaries) व्यक्तींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची छाननी करण्यासाठी केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त ह्या संस्थांची स्थापना करणे हा ह्या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

लोकपाल म्हणजे एक अध्यक्ष आणि ८ सदस्य. ह्यातले ५०% पेक्षा जास्त सदस्य हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला असतील.  

आजी-माजी पंतप्रधान, आजी-माजी केंद्रीय मंत्री, खासदार, सर्व प्रकारचे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील अधिकारी ह्यांची चौकशी ह्या कायद्याच्या अंतर्गत होऊ शकते.

ह्या लोकपाल संस्थेच्या दोन शाखा असतील. एक चौकशी शाखा अणि दुसरी कायदेशीर कार्यवाही करण्याची शाखा.

जनतेतल्या कुणाकडूनही विहित नमुन्यात अर्ज आल्यास (कलम २०) लोकपाल त्यात चौकशी करण्याची गरज आहे की नाही हे ठरवतील. जर तसं तथ्य असेल तर तशी चौकशी सुरू होऊ शकते. ही चौकशी करताना लोकपाल इतर संस्थांचं सहकार्य घेऊ शकतात. तसेच ह्यासाठी विशेष न्यायालयं स्थापन करण्याबाबत सरकारला सुचवू शकतात.

लोकपाल आणि लोकायुक्त ह्यांची नेमणूक झाल्यावर ते लोकांनी कशी दाद मागायची ह्याची एक पध्दत ठरवून देतील असंही ह्या कायद्यात म्हटलं आहे. परंतु पाच वर्ष झाली, ना लोकपालाची नेमणूक झाली ना पुढची कार्यवाही.

निवडून दिलेल्या सरकारला आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या अधिकारी वर्गाला उत्तरदायी ठरवण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त ह्या संस्थांची नितांत आवश्यकता आहे. काल जर ह्या लोकपाल ह्या संस्थांची निर्मिती करू हे सरकारनं अण्णांना आश्वासन दिलं असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे.

अण्णांनी त्यांचं काम केलं आहे.

ह्या देशाचे नागरिक म्हणून आपण ह्या सरकारनं ह्याची निर्मिती गेल्या पाच वर्षात का केली नाही हा प्रश्न तर विचारलाच पाहिजे परंतु ही व्यवस्था निर्माण होईल, रूजेल अणि वाढेल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यातच आपल्या सर्वांचं भलं आहे. ती आपली जबाबदारी आहे.

बुधवार, जानेवारी ३०, २०१९

दुष्काळ - आपण आत्ता काय केले पाहिजे?

दुष्काळ : काय केले पाहिजे?


दुष्काळ जाहीर झाला. सरकारनं केला. त्याला तीन महिने झाले. त्यानंतर काल मदतही जाहीर झाली. मग आता महाराष्ट्र सैनिकांचं काम काय? आपला १४ कलमी कार्यक्रम. 

दुष्काळ जाहीर करण्यापासून आपल्याला लक्ष ठेवणं भाग असतं. परंतु आता दुष्काळ जाहीर झाला आहे तर काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. 

एक गोष्ट महत्वाची की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सुमारे ६०% भाग दुष्काळी म्हणून जाहीर केला आहे. ह्याचा अर्थ ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण व्यक्ती म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, पक्ष म्हणून किंवा एखादी संस्था म्हणून ह्या मोठ्या संकटाला पुरे पडणार नाही. केवळ सरकारच इतक्या मोठ्या प्रमाणात काहीतरी करू शकतं. त्यामुळे सरकार काय करत आहे ह्याकडे लक्ष ठेवणं हे आपलं महत्वाचं काम आहे. सरकार हे जे काही करत आहे ते आपणच दिलेल्या कराच्या पैशातून करत आहे. त्यामुळे त्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. ते आपण करावं. 

दुसरी गोष्ट अशी की “दुष्काळ, दुष्काळ” म्हणून नुसती भुई बडवण्यात काही अर्थ नाही. नेमकी परिस्थिती काय, काय केलं पाहिजे, सरकार काय करत आहे, सरकार कुठे कमी पडत आहे, कुठे मला काय करता येण्याजोगं आहे हे पहाणं महत्वाचं आहे. 

दुष्काळात सर्वात चार गोष्टींची मोठी कमतरता असते. एक प्यायला पाणी, दुसरं, जनावरांना चारा, तिसरी गोष्ट लोकांना रोजगार आणि चौथी, रेशनवरचं स्वस्त धान्य. ह्या चार गोष्टी अती महत्वाच्या…. ह्यानंतर मग शाळेतल्या मुलांना फी न परवडणं, आरोग्य, वृध्दांची काळजी, पत व्यवस्था, सुलभ कर्जव्यवस्था, कर्जमुक्ती, स्वस्त दरात दर्जेदार बी-बियाणं मिळणं, शेतमालाला योग्य भाव, शेतपंपांना सवलत ह्या गोष्टी आहेतच. ह्या शिवाय ज्यांचं पोट हातावर आहे असे, महिला, वृध्द अशांना दुष्काळाची मोठी झळ बसते. त्यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज असते.

म्हणून खालील गोष्टी केल्या पाहिजेत.

तातडीच्या:

१) नागरिकांना पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. आपल्या कार्यक्षेत्रात जिथे जिथे लोकांना प्यायचं पाणी मिळत नसेल तिथे तिथल्या प्रशासकीय यंत्रणेला (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) पत्र लिहून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावी. तिथल्या किमान ५ महिला आणि ५ पुरुष नागरिकांनी लेखी कळवलं पाहिजे. ते त्यांनी लिहावं ह्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा. तिथे २४ तासात पाणी मिळावं म्हणून प्रयत्न करा. पाणी ही जगण्यासाठी मूलभूत गरज आहे.
२) गावात किती जनावरांना चारा मिळण्याची गरज आहे त्यांची संख्या प्रशासनाला ताबडतोब कळवा. ह्यासाठी देखील लेखी निवेदन, लोकांच्या सही, अंगठ्यासह, द्या. 
३) मनरेगातून आणि महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेतून ज्या लोकांना काम हवं आहे त्यांना कामाची मागणी करा. ह्यात कामाची मागणी करण्याची एक पध्दत आहे. त्या पध्दतीचा अवलंब करा. उदाहरणार्थ: प्रत्येकाला “जाॅब कार्ड” काढून देणे वगैरे. ह्याचा तपशील तुम्हाला ह्या दोन्ही योजनांच्या संकेतस्थळांवर मिळेल.
४) दुष्काळग्रस्त भागात रेशनबाबत काय निर्णय झाले आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारा. त्याची अंमलबजावणी आपल्या भागात होते आहे की नाही हे पहा. ह्यात खूपदा भ्रष्टाचाराच्या घटना होत असतात त्याकडे लक्ष द्या. 

वरील ४ गोष्टी फार महत्वाच्या. त्याखेरीज :

५) गावात असलेल्या आणि बंद पडलेल्या पाणी योजनांची दुरूस्ती ताबडतोब करून घ्या. त्याचा विस्तार करण्यासाठी रितसर अर्ज द्या. ह्यासाठी वाटलं तर “विशेष ग्रामसभा” बोलवा.
६) गावातल्या सार्वजनिक विहिरींचा गाळ काढणे हे काम रोजगार हमी मधून होऊ शकतं. त्याचप्रमाणे त्याचं खोलीकरण, विहिरी दुरूस्त करणं ह्याकडे लक्ष द्या. 
७) टॅंकर किंवा बैलगाडीतून पाण्याची मागणी करा. पाणी साठवण्यासाठी ५,००० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या टाक्यांची मागणी करा.
८) जी घरं अनुदानित अन्नधान्यासाठी पात्र असतील आणि ज्यांची रेशनकार्ड नसतील त्यांच्यासाठी ती कार्ड बनवून घेण्याची प्रशासनाला मागणी करा. 
९) दुष्काळग्रस्त लोकांनी अनुदानित दरात, स्वस्त दरात दर्जेदार बी-बियाणं मिळावं म्हणून निवेदन द्यावं. आपण त्याचा पाठपुरावा करावा. 
१०) वृध्द, शारिरीक दृष्ट्या कमजोर अशा लोकांसाठी “सार्वजनिक स्वयंपाकघर”  (Community Kitchens) सुरू करण्याची मागणी करा. 

आणि थोडं लांब पल्ल्यासाठी :

११) बी-बियाणं कोष (Seed Bank) सुरू करण्याची मागणी करा.
१२) चारा कोष (Fodder bank) सुरू करण्याची मागणी करा.
१३) धान्य बॅंका सुरू करा. त्यासाठीही सरकारची मदत घ्या.
१४) हवामानाची योग्य माहिती शेतकरी वर्गाला मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाला करा. 

महाराष्ट्राचा दुष्काळ खूप गंभीर आहे. त्याचा नीट नायनाट केला नाही तर ग्रामीण भागाच्या आजिविकेचे आणि तिथल्या संस्कृतीचे दोर कापले जातील. आपलं महाराष्ट्रावर प्रेम आहे. आपण दुष्काळ हटवलाच पाहिजे.


अनिल शिदोरे
anilshidore@gmail.com

मंगळवार, जानेवारी २९, २०१९

चांगले दिवस सरत आले ...

चांगले दिवस सरत आले …


सर्वांनी चांगलं जगावं. सर्वांनी श्रीमंत व्हावं. सर्वांना श्रीमंत, संपन्न होण्याची समान संधी असावी. ते होताना त्यात निकोप स्पर्धा असावी. अशी स्पर्धा ज्या स्पर्धेतून माणसाच्या सर्व क्षमता विकसित होतील आणि माणसाचा अधिक चांगला समाज करण्याचा शोध सतत चालू राहील. हे चांगल्या, सुदृ्ढ समाजाचं  लक्षण. 

परंतु, काहीच श्रीमंत होतील, तेच श्रीमंत रहातील. त्यांचीच संपत्ती वाढत जाईल. वाढतच जाईल. त्या श्रीमंतांचं वेगळं जग तयार होईल. मग त्या संपत्तीकडे पहात काही थोडे धडपडत रहातील. बहुसंख्य गरीब अधिक गरीब होत रहातील. त्या पहिल्या जगापासून हे जग दूर दूर जाईल. हे म्हणजे विकृत समाजाचं लक्षण. 

गेली काही वर्ष डेव्हाॅसला ऑक्सफॅम समाजातली ही विकृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दिसतंय असं की ह्यात सुधारणा न होता विकृती वाढतच चालली आहे. तुम्हाला डेव्हिड अॅटनबरो आठवतोय? ज्याच्या “प्लॅनेट अर्थ” सारख्या माहितीपटानं आपल्याला आपलाच परिसर किती सुंदर आणि नयनरम्य आहे हे सांगितलं. त्या सध्या ९२ वर्षाच्या ह्या प्रतिभावान माणसानं कालच त्या परिषदेत सांगितलं की “चांगले दिवस आता सरले आहेत”.. 

आकडेवारीत फार जायची गरज नाही. भारतातल्या फक्त १% लोकांकडे देशातली ५१.५३% संपत्ती आहे किंवा अतीश्रीमंतांच्या संपत्तीवर फक्त अर्धा टक्का “संपत्ती कर” लावला तर देशातल्या आरोग्य सेवेवर आपल्याला ५०% अधिक खर्च करता येईल इतकं पुरेसं आहे. सांगोल्याहून पुण्याला आलेल्या तुकारामनं गेली १० वर्ष पै अन पै जमा केली आणि बापाच्या आजारपणात सगळी गेली. नंतर काही दिवसानी बापही सोडून गेला. मेळघाटच्या अशोकच्या मनात श्रीमंत व्हायचं आहे, पण श्रीमंत व्हायचं तर जे शिकावं लागेल ते सध्या विकतच मिळतं. ते खरेदी करायचं तर वडिलोपार्जित जमीन त्याला विकावी लागेल. काय करावं त्याच्या पुढे प्रश्न आहे. 

त्यामुळे आकडेवारीपेक्षा आपल्या आसपास काय दिसतंय हे महत्वाचं. श्रीमंत आणि गरीबांच्या शाळा वेगळ्या. खरेदी करण्याची दुकानं वेगळी. प्रवास करण्याचे मार्ग वेगळे. पुढे जाण्याची संधी वेगळी. ती दोन्ही जगंच वेगळी. असं होताना दिसतं आहे. गेल्या चार-पाच वर्षांचे अहवाल पाहिले तर हे जवळ येतंय असं दिसत नाही. किंबहुना अधिक गतीनं ह्यांच्यातील फरक वाढताना दिसतो आहे. मी जेंव्हा ह्या वाढत्या विषमतेविषयी अर्थतज्ञांशी बोलतो किंवा समाजात ज्यांना जाणकार, विद्वान म्हटलं जातं अशांशी बोलतो तेंव्हा “विषमता” हा कुठला “डाऊन-मार्केट विषय” असा त्यांचा चेहरा होतो. ही समाजाचं धोरण ठरवणारी माणसं पण ह्यांनी कानावर हात ठेवले आहेत. दुष्काळानं लोक जगायला आपापली गावं सोडता आहेत असं म्हटलं तर त्याचा अर्थ त्यांना समजत नसल्याचा त्यांचा चेहरा होतो. त्यांनाही कुठलीतरी सवंग चटक लागली असल्याचं त्यांचा चेहराच सांगतो. त्याशिवाय ह्या गोष्टी ऐकू येणार नाहीत असं होणार नाही. 

थाॅमस पिकेटीनं काही वर्षांपूर्वी जगातली ही विषमता दाखवली आणि आपली भांडवलशाहीच गंडली आहे का, किंवा पराभूत झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली. दर वर्षीच्या ऑक्सफॅम अहवालानं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु परिस्थिती आता अहवाल लिहिण्या-वाचण्याच्या पलिकडे गेली आहे. 

ह्या दोन जगातलं हे अंतर असंच वाढत गेलं तर काय होईल? एका मोठ्या वर्गाला सतत वंचित ठेवून श्रीमंतांना त्यांची श्रीमंती भोगता तरी येईल का हा प्रश्न आहे. तीव्र सामाजिक असंतोष विचित्र पध्दतीनं बाहेर येत राहील. ह्या श्रीमंतांच्या हावरटपणापायी निसर्गही प्रतिकार करेलच. आज तो प्रतिकार हवामानातील बदल किंवा तापमानवाढीनं समोर येतो आहे. निसर्गाच्या तापमानाबरोबर समाजाचंही तापमान वाढेल. अस्वस्थ, रागावलेल्या गरीबांचे लोंढे श्रीमंतांच्या वस्तीबाहेर आदळतील. आत्ता ते आदळत नाही आहेत कारण त्या अस्वस्थ लोकांतील काहींना वाटतंय की आपणही इतरांच्या नकळत हळूच शिडी चढून “त्या” जगात प्रवेश करू. अगदी त्या जगात नाही तरी त्या जगात जाऊ इच्छित असलेल्या एका स्वप्नाळू जगात जाऊ. एखादी पीढी ह्यात वाट पाहील अधिक नाही. 

मग ज्यावेळी सामाजिक असंतोष प्रगट होईल त्याचवेळी निसर्गही कोपला असेल. तोपर्यंत पृथ्वीही इतकी तापलेली असेल की फार उत्तर शोधूनही उपयोग नसेल. हे खरं आहे की ज्या ज्या वेळी माणसासमोर संकटं आली त्या त्या वेळी त्यानं त्याच्या समजंसपणानं त्यावर मात केली. ज्या ज्या वेळी त्याला मार्ग सापडत नाही असं वाटलं त्या त्या वेळी त्यानं नवा धर्म शोधला किंवा नवी जीवनपध्दती. 

“चांगले दिवस सरत आले ..” असं म्हणताना त्या डेव्हिड अॅटनबरोनं ही एक सूचना देऊन ठेवली आहे. आपला आपल्या समजंसपणावर विश्वास आहे. काही लोकांच्या वैयक्तिक हावरटपणापोटी सगळं घालवून टाकायला आपण तयार नाही. आपल्याला ह्यासाठी व्यापक घुसळण करावी लागेल. ह्या व्यापक घुसळणीतून नवा समाज, नवा जीवनधर्म, नवी जीवनप्रणाली आणि नवी आर्थिक व्यवस्था उदयाला येईल. ती व्हावी ह्यासाठी आपले प्रयत्न हवेत.


अनिल शिदोरे
anilshidore@gmail.com

शनिवार, जानेवारी २६, २०१९

.. तरीही प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !


…. तरीही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

लोकांच्या हातात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य म्हणजे प्रजासत्ताक, पण तसं घडतंय का?

आज प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या दिवशी ६९ वर्षांपूर्वी आपण आपली राज्यघटना स्विकारली. आपण लोकशाही मानली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव स्विकारला आणि मुख्य म्हणजे लोकांची सत्ता ह्या देशावर चालेल दुसरी कुणाची नाही हे ठरवलं. ह्यातला “प्रजा” हा शब्द खटकणारा आहे. कारण, “प्रजा” म्हटलं की मग “राजा” येतो आणि लोकशाहीत कुठला आला आहे राजा? पण त्यावर आत्ता नको. नंतर कधीतरी.

त्यामुळे भारताच्या नजिकच्या इतिहासातील “प्रजासत्ताक दिन” ही कदाचित सर्वात महत्वाची घटना असावी. कारण आपला देश कसा चालावा, कुठल्या तत्वांवर चालवावा ह्याचा निर्णय आपण आज घेतला. त्यात आपण ठरवलं की लोकांनी हा देश चालवावा. राज्यकारभारात विकेंद्रीतता असावी आणि राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढवावा.

असं असलं तरी गेल्या काही वर्षात सत्तेचं केंद्रीकरणच जास्त होताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर लोकांचा राज्यकारभारात कमीत कमी सहभाग कसा होत जाईल इकडेच आपला कल आहे. हे काही जाणून बुजून केलं जात असेल असं नाही परंतु होतं आहे हे मात्र खरं. त्याची काही उदाहरणं…

१) जीएसटीमुळे राज्यांचा महसूल कमी झाला. सुमारे ६५% नी. महसूल कमी झाला आणि केंद्राचा वाढला. म्हणजे पूर्वी महाराष्ट्राच्या राजधानीत आपण जितके निर्णय घेऊ शकायचो त्यापेक्षा ६५% निर्णय आपण कमी घेऊ लागलो. तितक्या टक्क्यांनी आपली महाराष्ट्रावरची “सत्ता” कमी झाली.

२) सध्या शिक्षणाचं धोरण केंद्र ठरवतं आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाच्या शाळा कमी होऊन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा वाढत आहेत. त्यामुळे त्याचे निर्णय दिल्लीत ठरत आहेत.माझी "मराठी" चेपली जात आहे.

३) माझ्या महानगरपालिकेची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे “स्मार्ट सिटी” ची. त्याचे निर्णय मी निवडून दिलेले नगरसेवक घेत नाहीत तर दिल्लीतील बाबू घेतात. तिथेही माझी “सत्ता” कमी झाली.

४) महानगरपालिकेचं महत्वाचं काम “स्वच्छता”. तिथे आता केंद्र घुसलं आहे. “स्वच्छ भारत” योजनेच्या अंतर्गत.

५) मेट्रोचं बांधकाम जोरात सुरू आहे. त्याचेही निर्णय माझ्या शहरात होत नाहीत. त्याचं एक काॅर्पोरेशन आहे, त्याची सूत्रं दिल्लीत आहेत.

६) “आरोग्य” हा खरंतर माझ्या संविधानानं सांगितल्याप्रमाणे राज्यांचा विषय. जिथे माझ्या आमदारांनी निर्णय घ्यायचे आहेत. तिथेही निर्णय केंद्रानं घ्यायचे आणि आम्ही फक्त पाळायचे असं सुरू झालं आहे.

७) नाशिक जिल्ह्यातलं माझ्या महाराष्ट्राचं पाणी आहे. माझ्या हक्काचं आहे. ते किती गुजरातला द्यायचं, त्याचं काय करायचं ह्याचेही निर्देश दिल्लीहून येत आहेत. तिथेही माझी “सत्ता” कमी झाली.

८) मी माझ्या राज्यात शेतमाल केव्हढ्याला विकायचा हा ही अधिकार मला नाही. केंद्र शेतीविषयक आयात-निर्यातीचं धोरण ठरवतं. तिथे माझी “सत्ता” नाही.

९) माझ्या शहरातील माझा प्रभाग पूर्वी लहान होता. पंधरा हजाराचा. आता तो मोठा केला आहे. तो झाला आहे साठ हजाराचा. पूर्वी मला माझा नगरसेवक कोण हे माहीत असायचं आता चार जण आहेत. मला कुणाकडे जायचं कळत नाही. त्यांनाही कळत नाही. प्रभाग मोठा असल्यानं माझा नगरसेवक माझ्यापासून लांब गेला.

१०) माझ्या राज्यात दुष्काळ आहे, पण माझा मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करू शकत नाही. तिथेही माझी “सत्ता” नाही.
११) माझ्या राज्यातून बुलेट ट्रेन जाणार. माझ्या शेतकरी भावा-बहिणींच्या जमिनी जाणार. पण ती बुलेट ट्रेन मला हवी की नको मला कुणी विचारलं नाही. इतकं कशाला मी निवडून दिलेल्या आमदारांनाही विचारलं नाही. अशी माझी “सत्ता” कमी झाली.

१२) माझी भाषा मराठी. ती अभिजात आहे की नाही, हे ही मी ठरवू शकत नाही. त्याचाही निर्णय दिल्लीत होणार आहे. इतकं कशाला, माझ्या राज्यातील गड-किल्ले. त्याची देखभाल कशी करायची हे मी नाही ठरवू शकत. ते “दिल्ली” ठरवते. ज्या दिल्लीच्या सत्तेविरूध्द महाराष्ट्र लढला ती “दिल्ली” ठरवते.

अशी कितीतरी उदाहरणं…

त्यामुळे आज प्रजासत्ताक दिन आहे खरं पण माझी “सत्ता” एक नागरिक म्हणून कमी होते आहे… अर्थात काही लोक म्हणतील झाली थोडी सत्ता कमी तर कुठे बिघडतं? विकास हवा तर स्वातंत्र्य थोडं कमी झालं तर चालेल की. चीनला नाही का, लोकशाही नाही म्हणून तिथे प्रगती अधिक गतीनं होते आहे… पण मला नाही पटत. साखळीनी बांधून ठेवायचं आणि गोड-धोड घालायचं मला नाही चालणार.. माझे निर्णय मी घेतो आहे हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ते हळूहळू हरवतं आहे .. पण तरीही प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोमन शुभेच्छा !
 

अनिल शिदोरे anilshidore@gmail.com

शुक्रवार, जानेवारी २५, २०१९

१ फेब्रुवारीला पियूष गोयल काय करणार?


अर्थसंकल्प मांडताना पियूष गोयल काय करणार?

ह्या सरकारचा अधिकार नव्या आर्थिक वर्षातील फक्त ७ आठवड्यांपुरता मर्यादीत आहे पण तरीही थेट करप्रणालीत हे सरकार बदल करणार की संसदीय लोकशाहीचे संकेत पाळणार?

पुढच्या शुक्रवारी म्हणजे १ फेब्रुवारीला लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ज्या लोकसभेची म्हणजे १६ व्या लोकसभेची मुदत मे महिन्यात संपणार आहे. त्यामुळे संसदीय लोकशाहीच्या संकेताप्रमाणे ह्या लोकसभेला “संपूर्ण अर्थसंकल्प” विचारात घेण्याचा अधिकार नाही. ह्या सरकारला फक्त लेखानुदान मांडण्याचा अधिकार आहे. लेखानुदान म्हणजे ज्यात कुठल्याही प्रकारे “थेट करप्रणाली” मध्ये सरकार बदल करू शकत नाही. हे करण्याचं कारण फार सरळ आहे. ह्या सरकारकडे नवीन आर्थिक वर्षातील फक्त ७ आठवडे इतकाच कार्यकाळ आहे. बाकी ४५ आठवड्यात काय करायचं हे १७ व्या, म्हणजे नव्यानं निवडून येणार आहेत अशा, लोकसभेनं ठरवायचं आहे. 

अर्थात अर्थसंकल्पाच्या बाहेर जाऊन विशेष परिपत्रक काढून जे कर थेट कर नाहीत अशांमध्ये सरकार बदल करू शकते, परंतु अशा करात सीमाशुल्क (कस्टम) सोडलं तर सर्वात मोठा भाग वस्तु आणि सेवा कर आहे (जीएसटी). ज्याचे निर्णय जीएसटी परिषद (काऊन्सिल) घेते. त्यामुळे करप्रणालीत फार मोठे बदल हे केंद्र सरकार करू शकत नाही आणि आत्ताची लोकसभा त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करू शकत नाही. त्यामुळे पियूष गोयल, ज्यांच्याकडे केंद्रीय वित्त मंत्र्यांचा अतिरिक्त भार आहे, ह्यांनी फक्त लेखानुदान जाहीर करावं आणि फारतर आपल्या सरकारची वित्तविषयक किंवा अर्थविषयक भूमिका जनतेसमोर ठेवावी इतकीच अपेक्षा आहे. म्हणजे असंच करायचं असतं आणि असंच जसवंतसिंगांनी, अटलबिहारी वाजपेयी असताना, २००४ मध्ये केलं होतं. तेंव्हा संकेत मोडला नव्हता. 

मग प्रश्न हा आहे की पियूष गोयल काय करतील? कारण त्यांनी जर “संपूर्ण अर्थसंकल्प” (Full Fledged Budget) मांडला तर ह्या सरकारनं पाच अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार असताना सहा अर्थसंकल्प मांडले असं होईल.

काय करतील सांगता येत नाही. कारण, मोदी सरकारच्या खूप गोष्टी अतर्क्य आहेत. त्यांचा अंदाज येत नाही. मोदींचा आणि त्यांच्या सरकारचा स्वभाव पहाता ते आत्तापर्यंतचा संकेत मोडून “संपूर्ण अर्थसंकल्प” मांडण्याची संधी सोडतील असं वाटत नाही. आयकराच्या करप्रणालीत बदल करणे, मध्यमवर्गाला खूष करणे, थेट करात काही सवलती देणे असं करून निवडणुकीत लोकांची सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करतीलच. अर्थात त्याला आणखी एक कायदेशीर मार्ग आहे आणि तो म्हणजे जी थेट कर संहिता (Direct Tax Code) आहे ती बदलून घेणे. जी फक्त आयकर कायद्यात बदल केल्यानं करता येईल. तो पर्याय कदाचित ते निवडतील. 

काय करतील सांगता येत नाही. पण आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणात आणि सरकारी सेवेत १०% आरक्षण देण्याचा निर्णय संकेत गुंडाळून केंद्र सरकारनं घेतलाच की. एखादा इतका मोठा निर्णय घेतला जातो तेंव्हा काही माहिती जमा केली जाते, सर्वेक्षण केलं जातं जसं मराठा आरक्षणाबाबत केलं गेलं, सार्वजनिक मंचांवरून समाजात चर्चा घडवली जाते, लोकमानसाचा कानोसा घेतला जातो पण तसं काहीच हा निर्णय घेताना सरकारनं केलं नाही. हा निर्णय न्यायालयात टिकेल की नाही ह्याही बाबतीत तज्ञांच्या मनात शंका आहेत. मूळ घटनेनं दिलेल्या चौकटीच्या बाहेरचा निर्णय असा घाईघाईनं घेतला आहे, त्यामुळे संकेत मोडून मोदी काही करणारच नाहीत असं वाटत नाही. १ फेब्रुवारीला तेच बघायचं आहे . 

सरकारचं काम जनतेच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी घटनेतील मूल्यं राखून देश चालवणं हे आहे. नियमांची मोडतोड करून, संसदीय लोकशाहीचे संकेत बिघडवून, काहीही करून पण पुन्हा सत्तेत येण्यासाठीच काम करत रहायचं हे चूक आहे. 

म्हणून उत्सुकता आहे, १ फेब्रुवारीची.. पाहू काय होतंय.


अनिल शिदोरे, anilshidore@gmail.com

रविवार, मे ०६, २०१८

महाराष्ट्रानं मोठं स्वप्न पहावं...

महाराष्ट्रानं मोठं स्वप्न पहावं …

अनिल शिदोरे

समाजाची प्रगती त्या समाजाला काय स्वप्नं पडतात ह्यावर अवलंबून असते. मात्र ही स्वप्न पडण्याची शक्यता परावलंबनात नसते. सध्याचा काळ असा आहे की समृद्ध व्हा पण त्यासाठी अवलंबून रहा असं सांगितलं जात आहे. माझ्या मराठी समाजाचा इतिहास वेगळा आहे. तो स्वावलंबनाचा, स्वराज्याचा इतिहास आहे. सध्याच्या राज्यकारभाराच्या सूत्रांमुळे मराठी समाज स्वप्न बघण्याची आपली उर्मीच घालवून बसणार आहे का? ह्याला काही उपाय आहे का?

लहानपणी माझी आई उन्हाळ्याच्या सुट्टीत मला माझ्या मामाच्या कारखान्यावर पाठवायची. पुण्याजवळ हडपसरला त्याचा कारखाना होता. तिला वाटायचं की लहानपणापासून कारखान्यात जात राहिलं की मला त्याची आवड निर्माण होईल. महाराष्ट्रात तेंव्हा उद्योगाचं वातावरण होतं. शाळेत शिक्षिका असणारी माझी आईही त्या वातावरणातून सुटली नव्हती. महाराष्ट्राची स्थापना नुकतीच झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळून १२-१३ वर्ष झाली होती. सर्वत्र उत्साहाला उधाण होतं.

माझा मामा सांगतो त्याप्रमाणे देशातली स्वतंत्र अशी पहिली औद्योगिक वसाहत किंवा इंडस्ट्रियल इस्टेट हडपसरला निघाली. संपूर्ण देशातली पहिली. आज माझ्या मामाचं वय ९५ आहे. त्याची स्मरणशक्ती चांगलं काम करतीय. तो सांगत होता त्याप्रमाणे त्यावेळेसही गुजराती-मारवाडी मंडळी हडपसरमधल्या जागा घेण्यात पुढे होती. त्यानं मला नंतर असाही किस्सा सांगितला की त्यांनी तिथल्या फार जागा घेऊ नयेत आणि मराठी माणसांनी घ्याव्यात म्हणून तिथलेच एक-दोघं मराठी अधिकारी जागरूक होते. उद्योगांना पोषक असं त्यावेळचं महाराष्ट्रातलं वातावरण सांगताना माझ्या मामाचे डोळे आजही पाणावतात.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला गुजरात दाखवला तेंव्हा म्हणूनच फार हरखून गेलो नाही. माझ्या मनात महाराष्ट्रानं ह्या औद्योगिक क्षेत्रात गुजरातच्या आधी ४०-४५ वर्ष काय काय केलं होतं ते होतं. त्यामुळे थोड्या काळात गुजरातनी चमकदार कामगिरी केली ह्याखेरीज त्याचं काही विशेष वाटत नव्हतं. तिथे फिरताना महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आणि समृद्ध परंपरा मनातून जात नव्हती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं राज्य आम्ही स्वत: चालवू हा मंत्र आपल्याला देण्याअगोदर दोन-तीनशे वर्ष संतांनी महाराष्ट्राची ही भूमी खणून काढली होती. महाराष्ट्राचं समाजमन घडवलं होतं. स्वराज्याच्या स्थापनेनंतर साधारण १००-१२५ वर्ष मराठी साम्राज्याचा प्रभाव देशाच्या राजकारणावर होता. नंतर महात्मा फुल्यांच्या आगेमागे सुरू झालेलं समाज सुधारणेचं, प्रबोधनाचं एक मोठं युग महाराष्ट्रात रूजलं आणि मोठं झालं. शिक्षणाचा सर्वदूर प्रसार झाला. साहित्य, कला, शिक्षण, समाजकारण, चित्रपट, नाटक, विचार आणि विविध क्षेत्रातील संशोधन ह्या सगळ्याच क्षेत्रात महाराष्ट्र रसरशीत काम करत होता. नंतर विसाव्या शतकात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांची मोठी उभारणी झाली, ज्यानं इथं एक शिक्षीत, उदारमतवादी आणि संवेदनशील समाज तयार झाला. त्यानं महाराष्ट्रातील सामाजिक विषमतेच्या खुणा पुसायची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली होती. जिथे जिथे शिक्षित मनुष्यबळ असतं आणि व्यापार-उदीमाला खुलं, मोकळं वातावरण असतं तिथे भांडवल येतं, येत रहातं. तसंच ते महाराष्ट्रातही आलं. नव-महाराष्ट्राचा आकृतीबंध ठरायला सुरूवात झाली. त्याच सुमारास स्वातंत्र्य मिळालं, नंतर भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिकांना स्वत:चं राज्य मिळालं.

१९४०,५०,६० ही दशकं सध्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाची आहेत. आधीच इतर राज्यांच्या पुढे असलेला मराठी समाज ह्या दशकांमध्ये आणखी पुढे आला. विविध क्षेत्रात मराठी माणसानं आघाडीचं काम केलं. परंतु नंतर मात्र फिसकटायला सुरूवात झाली. महाराष्ट्राची स्वप्नं पहाण्याची क्षमता आणि नैतिक एकात्मता हरवत चालली. एखादा समाज स्वप्नं पहायचं थांबला की मग त्याची घसरण सुरू होते. तसं व्हायला लागलं. १९६०-७० च्या सुमारास त्यावेळी गुजरातच्या ४०-५० वर्ष, बिहार-उत्तरप्रदेशच्या १००-१२५ वर्ष किंवा इतर पुढारलेल्या राज्यांपेक्षाही २०-३० वर्ष पुढे असलेल्या महाराष्ट्राच्या आकांक्षेला ग्रहण लागल्यासारखं झालं. ह्यात नेमकं झालं तरी काय?

स्वतंत्र भारतात महाराष्ट्रानं मोठ्या भावाची भूमिका घेतली, चीन युद्धात सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला आणि गडबड सुरू झाली.

सध्या देशात तीन राज्यं अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या १९७१ ला जितकी होती त्यापेक्षा ४० वर्षांनी म्हणजे २०११ ला दुपटीनं अधिक झाली. ती राज्यं आहेत, उत्तर प्रदेश (८ कोटी ३८ लाखावरून, १९ कोटी ९५ लाख), बिहार (४ कोटी २१ लाखावरून, १० कोटी ३८ लाख) आणि महाराष्ट्र (५ कोटी ४ लाखावरून, ११ कोटी २३ लाख). इथे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रांगेत महाराष्ट्र कसा ह्याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल. कारण तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळची लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही. शिवाय कुटुंब नियोजनाचं कामही महाराष्ट्रात चांगलं झालं असल्याने महाराष्ट्रातला जन्मदर कमी आहे. मग तरीही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रांगेत कसा? असा प्रश्न तुमच्या मनात येईल, पण त्याचं उत्तर आहे स्थलांतर.

अगदी साधी आकडेवारी पहा. आकड्यांच्या जंजाळात फार जायला नको. १९९१-२००१ ह्या फक्त दहा वर्षात महाराष्ट्रात ४२ लाख लोक इतर प्रांतातून महाराष्ट्रात रहाण्यासाठी आले. ही सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणातून मिळालेली आकडेवारी आहे. ह्यानंतर स्थलांतराची किंवा भाषेप्रमाणे लोकसंख्येची आकडेवारी प्रकाशित करणं सरकारी आर्थिक सर्वेक्षणानं बंद केलं. त्याचं कारण तुम्हा-आम्हा सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातलं स्थलांतर साधारण ५० च्या दशकापासून सुरू झालं. म्हणजे साधारण सहा ते सात दशकं हे स्थलांतर चालू आहे. ९० च्या दशकात जर ४२ लाख असतील तर आधी आलेले आणि नंतर त्यांना झालेली मुलं-बाळं धरून सात दशकात साधारण अडीच ते तीन कोटी लोक हे बाहेरून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. म्हणून लोकसंख्या वाढीत उत्तर प्रदेश, बिहार च्या सोबतीनं महाराष्ट्राचा नंबर लागतो. जरी जन्म दरात महाराष्ट्रानं कपात केली असली तरी.          

अर्थात अडचण ही नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जिथे जिथे उद्योगधंदे जोरात असतात, आर्थिक भरभराट असते तिथे तिथे संधी शोधायला माणसं येतातच. लंडनला औद्योगिक क्रांतीनंतर झालं, न्यूयाॅर्क ला मागच्या शतकात झालं आणि बिहार, उत्तरप्रदेशात गंगाकिनारी समृद्धी नांदत होती तेंव्हाही असंच झालं. शिवाय भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाला कुठेही जाता येतं, फिरता येतं. त्यामुळे नुसते लोक आले ह्याला महाराष्ट्राच्या दुर्गतीचं कारण मानता येणार नाही.

खरी मेख वेगळीच आहे.

आपला देश एकत्र आला तेंव्हा देशाचा कारभार तीन स्तरांवर चालला पाहिजे हे ठरलं. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था. करप्रणाली तीनही स्तरांवर होती. कर गोळा करण्याचे अधिकार तीनही पातळ्यांवर होते. कर गोळा करणे आणि त्याचा विनियोग करणे ह्याची नीट व्यवस्था लागावी म्हणून वित्त आयोगाची स्थापना झाली. हा वित्त आयोग दर पाच वर्षांनी बसेल आणि केंद्राकडे येणारा महसूल राज्यांमध्ये कसा वाटायचा ह्यावर मार्गदर्शक सूत्रं देईल असं ठरलं. तो वित्त आयोग सांगेल त्या सूत्राप्रमाणे केंद्रात जमा झालेला कर राज्यात वाटला जाईल अशी योजना झाली आणि गडबड सुरू झाली. मेख आहे ती इथेच. महाराष्ट्रावरचा अन्याय इथूनच सुरू होतो आणि आज महाराष्ट्राचं असं का झालं ह्याचं काही प्रमाणात उत्तरही ह्यातच आहे.

काही दिवसांपूर्वी “मिंट” ह्या इंग्रजी वृत्तपत्रानं काही आकडेवारी तपासली, थोडी आकडेमोड केली आणि सांगितलं की महाराष्ट्र जेंव्हा केंद्राकडे कर म्हणून १०० रूपये पाठवतो तेंव्हा महाराष्ट्राला त्याच्या बदल्यात फक्त १३ रुपये मिळतात. ह्यात एक नेहमी सांगितलं जातं की मुंबईला खूपशा कंपन्यांची मुख्य कार्यालयं आहेत, त्यामुळे मुंबईत जमा केलेला उद्योगसंस्थांचा कर हा संपूर्ण देशात जमा केला जातो पण तो महाराष्ट्रात जमा केला आहे असं दिसतं. त्यामुळे महाराष्ट्रानं दिलेले १०० रूपये हे खरे महाराष्ट्रानं दिलेले नाहीत. मात्र “मिंट” नं आकडेमोड करताना ही गोष्ट विचारात घेऊन तसे बदल केले आणि नंतर केंद्र फक्त परत १३ रूपयेच देतं असा निष्कर्ष काढला. त्यामुळे हे नक्की की महाराष्ट्र फार मोठा कर गोळा करून केंद्राला देतो आणि त्याबदल्यात अत्यंत कमी रक्कम केंद्राकडून महाराष्ट्राला मिळते आणि हे सुमारे ६० ते ७० वर्ष चाललं आहे.

ह्या वित्त आयोगाची काही नितीसूत्रं आहेत. त्याच्या खोलात आत्ता इथे जायला नको, मात्र त्यांचं एक सूत्र आहे की देशात समान विकास व्हायचा असेल, देशातली विषमता कमी करायची असेल तर श्रीमंत आणि पुढारलेल्या राज्यांनी कमी विकास झालेल्या राज्यांना मदत केली पाहिजे. देश म्हणून विचार केला तर त्यात चूक नाही. महाराष्ट्राला ते मान्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र गेली ७० वर्ष कमी विकास झालेल्या राज्यांना आपल्या घासातला घास काढून देत आहे.

महाराष्ट्रानं स्वत: प्रगती केली, उद्योग वाढवले, अधिक कर गोळा केला आणि तो दिला कमी विकास झालेल्या राज्यांना. तो दिला अशासाठी की त्यांनी अधिक विकास करावा, रोजगार निर्माण करावा. मात्र तसं झालं नाही. ती राज्य इतकी वर्ष मदत करूनही रोजगार निर्माण करायला कमी पडत आहेत.  तसंच ती राज्यं लोकसंख्येवरही म्हणावं तसं नियंत्रण घालू शकलेले नाहीत. म्हणून तिथले बेरोजगारांचे लोंढे गेली चाळीस-पन्नास वर्ष महाराष्ट्रात रोजगार शोधत येत आहेतच. ते आले की मग त्यांना घरं द्या, सार्वजनिक सुविधा द्या, आरोग्यसेवा द्या हा ताणही पुन्हा महाराष्ट्रावरच. म्हणजे स्वत: विकसित आहोत म्हणून केंद्राचा हिस्सा अत्यंत कमी मिळणार आणि ज्यांना मदत करतो आहोत त्यांच्याकडे विकास होत नाही म्हणून पुन्हा त्यांच्याकडील बेरोजगारांचे लोंढे पुन्हा महाराष्ट्राच्या डोक्यावर !

हे कुठवर चालायचं?

खरंतर महाराष्ट्रातही विकासाचं संतुलन नाही. आकडेवारी असं सांगते की उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडच्या जिल्ह्यांपेक्षा मराठवाड्याचे जिल्हे मागे आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगार तरूण काम शोधत महाराष्ट्रातील शहरांमध्ये येतात पण त्यांना स्पर्धा करावी लागते उत्तर भारतातील तरूणाबरोबर, ज्या राज्यांसाठी महाराष्ट्रानं अगोदरच आपलं योगदान दिलं आहे. ते दिल्यावरही महाराष्ट्रातल्या तरूणाला महाराष्ट्रातील विकासाची फळं मिळत नाहीत. महाराष्ट्रानं ह्यासाठी भांडलं पाहिजे. आवाज उठवला पाहिजे. ह्यावर कुणी म्हणेल महाराष्ट्रानं अशी मदत केली आणखी तर काय बिघडलं? आपण सगळे भारतीयच आहोत ना? मग त्याला उत्तर असं की मग वित्त आयोगानंही राज्याला एकक (युनिट) मानून निधी देण्याची गोष्ट करू नये. ज्याअर्थी राज्य म्हणून ते युनिट मानत आहेत त्यावरून राज्याराज्यांनी स्वत:चाही विचार करावा हे गृहीत आहे.

महाराष्ट्र ओरबाडला गेला, मागे पडत गेला तो इथेच. देशातल्या इतर राज्यातील ओझं सतत सहा-सात दशकं अंगावर घेतल्यामुळे महाराष्ट्राला सर्वांगीण विकास साधता आला नाही. महाराष्ट्राची  स्वत:च्या विकासाची गती देशाबरोबर जाताना रखडली गेली.

हा वित्त आयोग आणि त्याची सूत्रं महाराष्ट्राच्या मूळावर आली आहेत. आतातर जीएसटी मुळे कर गोळा करण्याचं काम अधिक केंद्रीत आणि त्याचा विनियोग मात्र विकेंद्रीत असा प्रकार होतो आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आता भिकेचे कटोरे घेऊन केंद्राकडे नजर लावणार आहेत. वास्तविक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्वायत्त आणि स्वत:चं उत्पन्न मिळवण्याच्या बाबतीत स्वतंत्र असल्या पाहिजेत. जसा पैसा केंद्रीत झाला आहे तशा अनेक गोष्टी हळूहळू केंद्रीत होत चालल्या आहेत. एकेकाळची महाराष्ट्राची शिक्षणव्यवस्था अग्रणी होती, आता सीबीएसईच्या नादी लागून आपण आपली पातळी खाली आणली आहे. एकदा आर्थिक बाबतीत आपण दिल्लीच्या अधीन राहिलो की सगळ्या संस्कृतीतच ती लाचारी येते. त्याचा परिणाम रोजच्या जीवनव्यवहारावर येतो. समाजाचा कणा हळूहळू वाकायला लागतो. शिक्षण, आरोग्य, रस्तेबांधणी, शेती, वाहतूक अशा सगळ्याच बाबतीत विचारांच्या आणि आचाराच्या पातळीवर आपण केंद्रावर अवलंबून रहायला लागलो की मग आपण आपलं स्वत्वच गमावून बसू. स्वत:ची “मराठी” म्हणून ओळखच पुसून टाकू. आपली ओळखच पुसली गेली की एक समाज म्हणून आपल्याला नवी स्वप्नंही पडणार नाहीत.
जगाचा इतिहास पाहिला की लक्षात येतं की अशाच समाजांनी आपली उन्नती केली ज्यांना स्वत:ची स्पष्ट ओळख आहे, “आम्ही कोण आहोत?” ह्याची त्यांना पक्की जाण आहे. अशाच समाजांनी मानवी आविष्कारात उत्तुंग शिखरं गाठली ज्यांना एक समाज म्हणून त्यांचं असं एक स्वप्न होतं, एक आकांक्षा होती. आपला देश एक असला तरी तो इतका अफाट आहे की ह्या खंडप्राय देशाचं स्वप्न म्हटलं तर त्याच्याशी जोडून घेताना मला ते माझ्यापासून दूर वाटतं. जोडून घेता येत नाही.. त्यामानानं मला माझ्या मराठी समाजाचं चित्रं, स्वप्न किंवा आकांक्षा अधिक जवळच्या, अधिक सुस्पष्ट आणि अधिक नेमक्या कळू शकतात, भावतात ज्यामुळे मी अधिक प्रेरणेनं, उर्जा घेऊन कामाला लागू शकतो.

आम्ही सारे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं आहोत त्यांनी “स्वराज्याचं आणि समृद्ध मराठी समाजाचं” स्वप्न पहायला आम्हाला शिकवलं. मात्र हा वित्त आयोग, ज्यामुळे सगळं सगळं केंद्राच्या हातात जाणं आणि त्यामुळे महाराष्ट्र स्वावलंबी न रहाता सतत परावलंबी रहाणं होणार आहे, माझ्या समाजाच्या दृष्टीनं फार आश्वासक नाही. ह्यातून भविष्यात एक लुळेपण माझ्या समाजाला येण्याची शक्यता आहे.

निदान राज्याच्या ५८ व्या वर्षी तरी माझ्या मामाला जशी प्रेरणा ६० च्या दशकात मिळाली तशी प्रेरणा नव्या पिढीला देणारा, उर्जा देणारा महाराष्ट्र पुन्हा आपल्याला दिसेल का? वित्त आयोगाच्या किंवा इतर धोरणाच्या महाराष्ट्राला परावलंबनाकडे नेतील अशा सूत्रांना आपण आंधळेपणानं होकार देत रहाणार आहोत का? परावलंबनातून मिळणारी श्रीमंती आपल्याला हवी आहे की स्वावलंबनातून मिळणारी स्वप्नपूर्तीची आश्वासकता?

 

अनिल शिदोरे    anilshidore@gmail.com  
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

रविवार, ऑक्टोबर १६, २०१६

महाराष्ट्राला आज बाॅब डिलन हवा आहे

महाराष्ट्राला आज बाॅब डिलन हवा आहे:

बाॅब डिलनला परवा साहित्याचं नोबेल जाहीर झालं. वास्तविक डिलन हा रुढ अर्थानं साहित्यिक नाही. त्यामुळे त्याला हा पुरस्कार जाहीर झाला तेंव्हा जगात थोडं आश्चर्य वाटलं. .. मलाही वाटलं.

पाश्चिमात्य राॅक किंवा पाॅपविषयी मला फारशी माहिती नाही. कधी कधी कानाला गोड लागतं म्हणून ऐकत रहातो इतकंच. लिहिताना मला काही ऐकायला आवडतं. मग मी बाजूला काहीतरी लावून ठेवतो. तितकाच माझा ह्या संगीताशी संबंध. 

त्यामुळे डिलनविषयी फार माहिती नव्हती. 

एका गोष्टीमुळे मात्र त्याच्याबद्दल कुतूहल वाढलं. पूर्वी कधीतरी बराक ओबामांचा बाॅब डिलन हा आवडता गायक आहे हे वाचलं होतं. पण त्यापेक्षाही त्याला पुरस्कार देताना नोबेल कमिटीनी जे म्हटलं ते महत्वाचं होतं. त्यांनी म्हटलं होतं की “बाॅब डिलन ह्यांना हा पुरस्कार देण्याचं कारण म्हणजे त्यांनी थोर अमेरिकन गीतांच्या, गाण्यांच्या परंपरेतून एक नवा काव्याविष्कार तयार केला”… म्हणजे गाणी आणि गीतांमधून एका नव्या प्रकारच्या काव्याचा शोध घेतला. 

गाणी, गीतं हे लोकांच्या आवडीचे, लोकांच्या ओठावरचे “पाॅप्युलर” असे प्रकार आणि, कविता म्हणजे जरा थोडक्या अशा अभिजनांच्या आवडीचा मात्र जीवनाचा काहीतरी सखोल अर्थ शोधणारा प्रकार. अमेरिकन गाणी, तिथल्या लोकांच्या ओठावरची गीतं ह्याची एक परंपरा आहे. अनेक थोर गायक त्या परंपरेत गाऊन गेले. अजून ती परंपरा चालू आहे. त्या परंपरेत डिलननी एक काव्याचा अनुभव दिला. सामान्य माणसांची गाणी त्यांनी अशा पातळीवर नेली की त्यातून एक जीवनानुभव मिळू लागला. 

सर्वसामान्य माणसाच्या आवडीमध्ये त्यानी अर्थ भरला. म्हणजे जे सर्वांना आवडतं ते वरच्या दर्जाचं नसतं ह्याला छेद दिला. तेही कायम स्वरूपी टिकणारं असतं, थोर असतं हे त्यांनी आपल्याला सांगितलं. अभिजन वर्गाची अभिजात कला ही काहीतरी वेगळी असते हे खोटं पाडलं. सामान्य माणसाचं, त्याला आवडणारं साहित्य ह्यालाही कशी एक उंची गाठता येते हे सांगितलं.

अर्थात महाराष्ट्राला हे माहीत नाही असं नाही. महाराष्ट्राचं संतसाहित्य हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपलं संतसाहित्य हे अभिजन वर्गाचं नाही. ते सर्वसामान्य माणसाच्या अगदी काळजातलं आहे. साहित्य, कवितांपेक्षा अभंग, भारूड आणि किर्तनातलं आहे, पण तरीही अभिजात आहे.

म्हणजे कलेच्या क्षेत्रात अभिजनांची कला वेगळी आणि सर्वांना जी आवडते ती वेगळी असा फरक नसतो. सर्वसामान्यांना आवडणारं हे थातुरमातुर असतं, वरवरचं, लवकर नष्ट होणारं असतं असं नाही. गाणी ही कवितांपेक्षा मुळीच कमी दर्जाची नाहीत. कलेच्या क्षेत्रात अशा जाती, असे वर्ग नाहीत. तर त्यात त्या त्या प्रकारचं अस्सल असं असतंच असा ह्या पुरस्काराचा अर्थ आहे. 

ह्या बाॅब डिलनच्या कलेच्या व्यासंगाची सगळी जोपासना अमेरिकेतील नागरी अधिकारांच्या आंदोलनात तयार झाली. त्यानी जी गाणी दिली त्यात नवतरूणांचा आक्रोश होता, व्यवस्थेविरूध्दची चीड होती, धिक्कार होता. त्याच्या गाण्यांना “प्रोटेस्ट साॅन्ग्ज” म्हणायचे.. त्या आक्रोशातून नव्या समाजाची मांडणी करत अमेरिकन बदलाला त्यानं त्याच्या गाण्यातून कवेत घेतलं होतं, व्यक्त केलं होतं. 

आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? सध्याच्या अस्वस्थ वातावरणाला आवाज देणारी गाणी मराठीत आज लिहिली जाताहेत का? आज दिसतंय असं की महाराष्ट्रातला तरूण नव्या समाजाच्या कल्पना घेऊन आला आहे. पण त्या आकांक्षांना शब्दरूप देणारी किंवा त्यांना नवी स्वप्नं देणारी गीतकार मंडळी, कवी मंडळी सध्या आपल्याला दिसताहेत का?

मराठीतही खरं तर बाॅब डिलनसारख्या गाण्यांची, गीतांची एक परंपरा होती. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशांनी महाराष्ट्राची स्थापना झाली तेंव्हा आपल्या गीतांनी, शाहिरीनी महाराष्ट्र जागृत केला होता, त्याला स्वप्न दिलं होतं. पण सध्या ती परंपरा खंडीत झालेली दिसत आहे.   

मला आठवतं, काही वर्षांपूर्वी जर्मनीच्या एका विद्यापीठात “आम्हाला इंजिनियर्स नको, कवी हवेत” अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं. कलेच्या अभ्यासक्रमांना सरकारी मदत कमी झाली होती त्यावरचा तो राग होता. त्यांचं म्हणणं की समाजाला इंजिनियर्स बरोबरच कवी आणि साहित्यिकांची तितकीच गरज असते. 

पण, एखादा कोर्स सुरू करून किंवा महाविद्यालय काढून कवी तयार होत नाहीत. कवी काय किंवा लोकांच्या मनातली खदखद मांडणारे गीतकार काय, ते तयार होतात आसपासच्या वातावरणातून. आसपासचं वातावरण जर बदलाचं, परिवर्तनाचं किंवा कुठल्या ना कुठल्या धिक्काराचं असेल तर त्यातून उर्जा घेऊन कवी लिहितात. आणि, ते लिहायला लागले की त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा नवं वातावरण तयार होतं. नवनिर्मितीची भूक आसपास असेल तर त्या तडफेतून अशी गाणी तयार होतात. 

मला आठवतंय आमच्या ९४४ किलोमीटर्सच्या पदयात्रेतून रोज चालता चालता कितीतरी गाणी तयार व्हायची. पहाटे उठून आम्ही निघालो की नेहमी कधीही कविता न करणारे स्वत:ची गाणी गायला लागायचे. गणपत भिसे किंवा बापू कुलकर्णींनी “दुष्काळ हटवू, माणूस जगवू” वर कितीतरी गाणी लिहिली. आमचे निळोबा जाधव किर्तन परंपरेतले, ते त्या धाटणीत त्यांच्या मनातलं गायला लागायचे. गडचिरोलीच्या दारूमुक्ती आंदोलनात, मानवी हक्क अभियानाच्या मराठवाड्यातील आंदोलनात, विद्यार्थी संघटनेत किंवा अगदी मराठवाडा ईको ग्रुपच्या विकासवादी उपक्रमात देखील कितीतरी गीतकार, कितीतरी कवी निर्माण झालेले मी पाहिले आहेत. ही सगळी मंडळी त्या बाॅब डिलनचे भाईबंदच.

आज असं काही घडताना दिसत नाही. वातावरणातच गीतकारांचा उद्गार नाही. नवनिर्मितीची खळबळ नाही. समाजाला स्वप्न पडलेलं नाही. जसं स्वप्न डिलन गाऊ लागला तेंव्हा अमेरिकन समाजाला पडलं होतं.

वातावरणात गीतकारांचा उद्गार नसेल तर गंभीर गोष्ट आहे.

समाजाचा आक्रोश, समाजाचं म्हणणं मांडणारे आणि ते मांडताना नवसमाजाची कल्पना फुलवणारे कवी अधिकाधिक निर्माण व्हावेत आणि त्यांच्या गीतांमधून मराठी नवसमाजाची मांडणी व्हावी हीच इच्छा बाॅब डिलनच्या ह्या नोबेलच्या निमित्तानं माझ्या मनात आली. ती तुमच्यासमोर मांडली.


अनिल शिदोरे

१६ आॅक्टोबर, २०१६